About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

'मी महाकवी दुःखाचा' - चारुचंद्र उपासनी यांनी केलेले रसग्रहण.

मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल...
                       -ग्रेस
" माझ्या कवितेचं मूळ माझ्या दुःखात आहे.
(महाकवीच्या शोकाचा श्लोक होतो .
'श्लोकत्वमापद्यत यस्य श्लोकः')
हे दुःख वाहतं आहे म्हणजे अखंड आहे.
त्याचं नातं मनुष्यजातीच्या शाश्वत दुःखाशी आहे.
महानदी जशी कळीकाळातून वहातच असते तसा
त्या दुःखाचा प्रवाह आहे.
वरवर पहाता दिसतो तेवढाच त्याचा आकार नाही.
खोल नदी जशी अपार जलाला साठवते तसं ते दुःख आहे.
माझी कविता एखाद्या कोमल सुंदर फुलासारखी वाटते पण ती फुलं कोरली आहेत दगडासारख्या घन शाश्वत अन् पेलायला कठोर असलेल्या माझ्या दुःखातून "
असा अर्थ मला भावतो. मला भावलेला अर्थ प्रत्यक्ष ग्रेसना अभिप्रेत असेलच असं नाही. काव्य जितकं गूढ, सूचक अन् अमूर्त होत जातं, तितकं ते अधिकाधिक
व्यक्तिनिष्ठ अन् विविधार्थप्रवण होतं.
-© चारुचंद्र उपासनी.
26 मार्च 2015

प्रभू श्रीरामावरील आक्षेपांचे खंडन - लेखक: चारुचंद्र उपासनी.

राम असा नव्हता, राम तसा नव्हता, अमुक नव्हता, तमुक नव्हता, त्यामुळे तो माझा आदर्श ठरू शकत नाही, असे संदेश अलिकडे  फिरत असतात. त्यासाठी  हे उत्तर पाठवा .. आणि सांगा , 'प्रभू श्रीराम' आम्हा हिंदूंसाठी इतके आदरणीय का आहेत! रामचरित्रावर घेतल्या जाणार्या अनेक आरोपांना उदाहरणार्थ ' तो देव होता काय असला तर त्याला इतरांचं सहाय्य का घ्यावं लागलं? ', ' त्यानं वालीला कपटानं मारलं ' ' तप करणार्या शंबुकाचा त्यानं वध केला ' ' त्यानं सीतेवर अन्याय केला ' इ.
उत्तर देणारा लेख मी २०१५ या वर्षी रामनवमीच्या दिवशी चर्यापुस्तकावर (fb) टाकला होता तो आज पुनः टाकत आहे.
________________

१. हिंदु धर्म नराचाच नारायण जिवाचाच शिव होतो हे शिकवणारा आहे.

प्रत्येकात देव आहे हे त्यानं अन् इतरांनी ओळखावं. कुणी आकाशातला बाप येईल आणि आपलं कल्याण करील हे खोटं आहे. राम कृष्ण शिवाजी महाराज हे नराचे नारायण होण्याची उदाहरणं आहेत!!!

२. शूर्पणखा ही दुष्ट बुद्धीनं पुरुषांना भुलवून फसवणारी होती. तिचं नाक कापल्यामुळे तिचे हे गलिच्छ उद्योग थांबणार होते. त्यामुळे तिच्या कृत्यांना दिलेली शिक्षा योग्य होती.

३. ज्यानं सख्ख्या लहान भावाची बायको पळवली त्याच्या बाबतीत कशाला हवेत युद्धाचे नीतीनियम??? ओसामाला नाही का अमेरिकेनं रात्री तो निःशस्त्र असतांना ठार केलं...

४. युद्धात अनेकांचं सहाय्य लागतं ते योग्य पद्धतीनं मिळवणं हेच तर कौशल्य आहे. मानवदेहधारी रामानं मानवी मर्यादा सांभाळून युद्ध केलं आणि अनेकांचं सहाय्य त्यासाठी मिळवलं!!!

५. श्रीरामांचा स्वतःच्या पत्नीवर आत्यंतिक विश्वास होता निरतिशय प्रेम होतं. पण श्रीराम ही निव्वळ व्यक्ती नव्हती. प्रजेचं ते प्रतिनिधित्व करीत होते. त्यामुळे प्रजेच्या या राजामध्ये कुणीही किंतु शंका काढणं योग्य नव्हतं. आपली निष्कलंकता सर्व जगाला दर्शवण्यासाठीच सीतेनं अग्निपरीक्षा दिली. अग्निपरीक्षा म्हणजे कठीण कसोटीला उतरणं. भोळसट लोक त्याचा वाच्यार्थ घेतात आणि आश्चर्य म्हणजे टीकाकारही असाच अर्थ घेऊन टीका करतात...

६. पुढे सीतेचा त्याग लोकांमध्ये राजानं उत्तुंग आदर्श घालून देण्यासाठी केल्यावर श्रीरामचंद्रप्रभू व्रतस्थ राहिलेत. सीतेला ज्या राणीसुलभ सुखोपभोगांचा स्पर्श होत नव्हता त्या त्या गोष्टी त्यांनीही टाकल्यात.
सीतेला श्वापंदामध्ये नाही तर मुनींच्या आश्रमात सोडलं होतं!!!

७. सीतेचं भूमिगत होणं हे तिच्या निर्वाणाचं प्रतीक आहे. कोणत्याही डामडौलावाचून भगवती सीता पंचत्वात विलीन झाली.
टीकाकारांना हे मान्य आहे का सीतेसाठी स्वतः पृथ्वी दुभंगली आणि तिनं सीतेला उदरात घेतलं? असं असेल तर राम सीता यांचं दिव्यत्व आणि देवत्वही त्यांना मान्य करावं लागेल आणि देवांवर टीका करण्याचा आम्हा मानवांना काय अधिकार असा प्रश्न उपस्थित होईल...

८. शबरी कोणी ब्राह्मण किंवा क्षत्रिय नव्हती. तिची उष्टी बोरं खाणारा राम!!!
थोडं पाऊल वाकडं पडलं म्हणून बहिष्कारिल्या गेलेल्या अहिल्येला पुनः प्रतिष्ठा मिळवून देणारा राम!!!
वानर अश्या हीनत्वदर्शक अभिधेनं (नावानं ) हिणवल्या गेलेल्या किष्किंधा प्रांतातल्या मनुष्यसमूहातून अजिंक्य सैन्य उभं करणारा राम!!!
त्यातल्या अत्यंत बुद्धिमान प्रामाणिक सेवकाला हनुमानाला देवत्वाच्या पदवीला नेणारा राम!!!
शंबुकाचा शूद्र म्हणून वध करतो हे रामचरित्रात संभवत नाही.
ज्या उत्तरकांडात ही विकृत कथा आहे तेच विद्वानांनी प्रक्षिप्त मानलं आहे.
आमचा राम दुष्टाचा वध करणारा आहे तपश्चर्या करणार्यांचा नाही!!!
॥जय श्रीराम॥
रामनवमी, २०१५.
- ©चारुचंद्र उपासनी.
http://www.geetaupasani.com/2018/03/blog-post_24.html?m=1

23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.

उद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे!
निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन!
या कार्यक्रमाची पत्रिका आणि आजच्या तरुण भारत मध्ये आलेले वृत्त सोबतच्या छायाचित्रात जोडत आहे..
वेळ: संध्याकाळी 6.
स्थळ: मिलेनियम गार्डन, टिळकवाडी.
- गीता चारुचंद्र उपासनी.


गुढीपाडव्यानिमित्त!

सुभाषितरत्नानि

वसंतस्यागमे चैत्रे
वृक्षाणां नवपल्लवाः ।
तथैव नववर्षेsस्मिन्
नूतनं यश आप्नुहि ।।

मराठी रूपांतर

वसंत आला चैत्रात
वृक्षांस नवपालवी
तसेच नववर्षात
यश नवे तुम्हा मिळो

-©चारुचंद्र उपासनी