प्रद्युम्नवाटिका(शेरूबाग)
अध्याय पहिला (अर्जुनविषादयोग)
धृतराष्ट्र म्हणाला
धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रि अन्
काय करिती योद्धे वीर।
पुत्र माझे आणि पण्डुचे
सांग संजया मी अधीर।। १/१
संजय म्हणाला
रचित पाहुनी पाण्डवसेना
द्रोणाजवळी तो जाऊन।
काय बोलला दुर्योधन तो
संवाद राजा घे ऐकून।। १/२
गुरुजि पहा ही मोठी सेना
द्रुपदपुत्राने रचिली।
बुद्धिमान त्या तुमच्या शिष्ये
पाण्डवसेना ती सजली।। १/३
पहा इथे हे धनुष्यधरी
अर्जुन आणिक भीम जसे।
द्रुपद आणिक युयुधानासह
महारथी विराट असे।। १/४
श्रेष्ठ नर ते धृष्टकेतु
काशिराज अन् चेकितान।
पुरुजित् आणिक शैब्य सोबती
कुन्तिभोज ते शोभत छान।। १/५
पराक्रमी हा युधामन्यु हो
उत्तमौजा वीर्यवान्।
महारथि तो अभिमन्यू हो
द्रौपदिपुत्र शक्तिमान।। १/६
नायक तुम्ही मम सैन्याचे
कथितो तुम्हा आपुले बळ।
सवे घेउनी विशेष जे जे
योजा तुम्ही विशेष बळ।। १/७
युद्धविजयी तुम्हासारखे
भीष्म कर्ण अन् कृपही सवे।
अश्वत्थामा सौमदत्ती
विकर्ण आणिक कोण हवे।। १/८
आणिक कितितरी उदार होती
माझ्यासाठी जिवांवर।
युद्धनिपुण ते शस्त्र घालिती
विजयांसाठी शत्रूंवर।। १/९
(माझ्यासाठी = दुर्योधन स्वतःला उद्देशून म्हणत आहे)
अफाट अपुले बळ असे हे
भीष्मांनी हे राखिले।
परंतु त्यांचे बळ मर्यादित
भीमाने ते राखिले।। १/१०
आपआपुल्या नियुक्त स्थानी
रहा उभे तुम्ही निश्चये।
रक्षित व्हावे भीष्मपितामह
यत्न करा हा सकळ स्वये।। १/११
लगेच वृद्ध पितामहांची
शंखगर्जना दणाणली।
सिंहनाद तो ऐकुनि त्याची
छाती हर्षे दुणावली।। १/१२
(त्याची = दुर्योधनाची)
नंतर शंख ढोल नगारे
आणिक शिंगे ती किती।
एकाएकी वाजु लागली
नाद माजला किती किती।। १/१३
तेवढ्यात शुभ्र अश्वयुक्त त्या
रथात मोठ्या बसलेले।
कृष्णार्जुन मग शंख दिव्य ते
स्वतः वाजवते झाले।। १/१४
पाञ्चजन्य अन् देवदत्त अन्
पौण्ड्र नावाचे शंख।
कृष्णार्जुन अन् भीम फुंकिती
जणु आकाशी तो डंख।। १/१५
युधिष्ठिराने वाजविला मग
अनंतविजय हा शंख।
नकुल आणि सहदेवांचे
सुघोष आणि मणिपुष्पक।। १/१६
धनुष्यधारी काशिराज अन्
महारथी हे शिखण्डी।
विराट धृष्टद्युम्न सात्यकी
त्यांची कीर्ती त्रिखंडी।। १/१७
ऐका राजन् द्रौपदिपुत्रे
आणिक त्या हो द्रुपदाने।
महाबाहु त्या सौभद्राने
शंख फुंकिले एकेकाने।। १/१८
पृथ्वि कापली त्या घोषाने
छतही नभाचे फाटले।
कौरव हृदये चिरली गेली
भयही त्यातचि दाटले।। १/१९
समोर बघता कौरवांना
बाण सोडण्याच्या वेळी।
ऐका राजन् अर्जुन म्हणतो
श्रीकृष्णाला त्यावेळी।। १/२०
अर्जुन म्हणाला
अहो अच्युत रथ न्या माझा
दोन्ही सैन्यांच्या मध्ये।
कोणकोणते वीर पहातो
युद्धोत्सुक या रणामध्ये।। १/२१
(अच्युत = श्रीकृष्ण )
वीर कोणते आले येथे
लढू इच्छितो त्यांच्याशी।
यमसदनाला जातिल ते ते
युद्ध करोनि माझ्याशी।। १/२२
बघून घेतो त्यांना आता
फणफणले जे युद्धज्वरे।
लाड करण्या दुर्बुद्धाचे
आले धाउनि जे त्वरे।। १/२३
(दुर्बुद्धाचे = दुर्बुद्धी झालेल्या दुर्योधनाचे)
संजय म्हणाला
अशा प्रकारे संबोधित तो
अर्जुनद्वारे भगवंत।
सैन्यामध्ये नेई रथ तो
ऐक राजा भाग्यवंत।। १/२४
भीष्म द्रोण आणिक राजे
महाराजांच्या समक्ष।
कृष्ण म्हणाला पार्था आता
पहा कौरवां प्रत्यक्ष।। १/२५
काका मामा भाउबंद अन्
सखे सोयरे सोबती।
गुरू कृपाळू पाही अर्जुन
सैन्याच्या त्या मध्यवर्ती।। १/२६
त्या सुहृदांना पाहुनि अर्जुन
भावविव्हल जाहला।
शोकपूर्ण त्या हृदयावेगे
श्रीहरीशी बोलला।। १/२७
अर्जुन म्हणाला
पाहुनि माझे हे जे प्रियजन
युद्धोत्सुकही झालेले।
कंपित होई काया माझी
तोंडही माझे सुकलेले।। १/२८
काटा सरसर अंगावरती
काया माझी चळचळते।
गळे धनुष्य हातातुनही
त्वचाही माझी जळजळते।। १/२९
उभा न राहू शके इथे मी
डोके माझे गरगरते।
अशुभाच्या या संकेताने
हृदय केशवा धडधडते।। १/३०
नको रे कृष्णा राज्य विजय अन्
नको मला ती सुखे अनेक।
मारुनि युद्धी या स्वजनांना
श्रेय न दिसते काही एक।। १/३१
राज्यलक्ष्मी ज्यांच्यासाठी
सुखसंपत्ती मिळवावी।
विना त्यांच्या अस्तित्वाच्या
वृथा रे कृष्णा भासावी।। १/३२
असे इथे रे युद्धि ठाकले
प्राणधनांना ठोकारून।
वडीलधारी आणि पितामह
आणि लेकरे सरसावून।। १/३३
मामा आणिक वृद्ध सासरे
नातू शालक संबंधी।
ठार जाहलो तरी बरे ते
नको मारणे यांस कधी।। १/३४
कौरवांना मारुनि कुठले
सुख ते मिळणार जनार्दना।
पृथ्वी नाही त्र्यैलोक्याशी
नाही होणार ती तुलना।। १/३५
असतिल दुष्ट जरी हे कौरव
मारुनि यांना लागेल पाप।
स्वजनांना या ठार मारिता
ऐक माधवा होईल ताप।। १/३६
म्हणुनि मारणे योग्य नसे रे
यांना, कौरवस्वजनांना।
स्वजन मारुनी सांग माधवा
भोगु कैसे मी सुखांना।। १/३७
लोभाविष्ट ती मने जाहली
यांची दृष्टी आंधळली।
कुलक्षयाची मित्रवधाची
पापदशाही ना कळली।। १/३८
आपल्याला तर कळतो ना रे
दोष तरी कुलनाशाचा।
जनार्दना मग का न धरावा
मार्ग आता हा परतीचा।। १/३९
कुलक्षयाने नष्ट होतसे
शाश्वत ऐसा कुलधर्म।
धर्म नासता कुलहि नासते
आणि माजतो अधर्म।। १/४०
आणि अधर्म होता प्रबळही
होती दूषित कुलस्त्रिया।
वर्णसंकर पतित स्त्रियांसह
कृष्णा अशक्य टाळण्या।। १/४१
संकर नेतो नरकाला मग
कुलासह कुलबुडव्यांना।
श्राद्धविधींच्या पूर्ण अभावे
पितर पुरवितो नरकांना।। १/४२
वर्णसंकर करणार्यांच्या
अशा महान दोषाने।
जातिधर्म ते कुलधर्मासह
होतिल नष्ट पापाने।। १/४३
ऐकतो ऐसे देवा आम्ही
मिळे नरक त्यांना नित्य।
कुलधर्माचा नाश करिती
असे शाश्वत जो नित्य।। १/४४
अरे अरे रे पाप केवढे
करण्या झालो उद्युक्त।
स्वजन मारण्या झालो तत्पर
राज्यलोभे आसक्त।। १/४५
जरी विना मी प्रतिकाराच्या
शस्त्ररहित होऊनि रणी।
कौरवद्वारे ठार जाहलो
ठरेन धन्य मनोमनी।। १/४६
संजय म्हणाला
युद्धभूमिवरि असे बोलुनी
अर्जुन रथतळी बैसला।
धनुष्य टाकुनि बाणांसह तो
शोकमग्न अति जाहला।। १/४७
'ॐ तत्सत्'म्हणु या आता
गीता उपनिषदातला।
अर्जुनविषादयोग म्हणुनी
अध्याय पहिला संपला।।
©चारुचंद्र उपासनी.
No comments:
Post a Comment