About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

गीतानुवाद, अध्याय दुसरा.

प्रद्युम्नवाटिका  (शेरूबाग)

अध्याय दुसरा (सांख्ययोग)

संजय म्हणाला 

त्या तशा त्या करुणापूर्ण
व्याकुळ ओल्या डोळ्यांच्या
अर्जुनाशी बोले माधव
करी गोष्टि तो मोलाच्या २/१

श्रीभगवान म्हणाले

कुठे आठवली तुला अवदसा
अशा संकट समयाला
असभ्यवर्तन मलिनकीर्तिचे
नेणार नाही स्वर्गाला    २/२

अशी षंढता तुला न शोभे
वीरवर तू असे रणी
क्षीणदशा ही हृदयाची रे
टाक रहा तू उभा क्षणी     २/३

अर्जुन म्हणाला 

लढू कसा मी द्रोणांशी अन्
भीष्मांशी या बाणांनी
पूजावे मी नित्य जयांना
सुगंधि कोमल पुष्पांनी     २/४

लोभी असतील गुरु जरी हे
मारणे त्यांना कसे बरे
भोग भोगणे रक्तयुक्त ते
भीक मागणे अधिक बरे     २/५

नाही जाणत श्रेष्ठ काय ते
जिंकणे अथवा जिंकले जाणे
एक जाणतो , मारुनि यांना 
नको मला ते असले जगणे   २/६

दुर्बलतेने ग्रस्त असा मी
काय करावे मुळि न कळे
खरे काय ते तू उपदेशी
शिष्य तुझा मी कधि न ढळे    २/७

साधन नाही कुठले दिसते
ताप मनाचा दूर करी
त्र्यैलोक्याचे राज्य मिळे जरि
नाही जाणार ताप तरी     २/८

संजय म्हणाला 

परमप्रतापी अर्जुन ऐसे
बोलु लागला कृष्णाशी
' लढणार नाही ' म्हणून ऐसे
बसला गप्प त्या सरशी    २/९

शोकमग्न तो पाहुनि अर्जुन 
सैन्यामध्ये बसलेला
कृष्ण हसोनी हळुचं तयाशी
ऐसे बोलू लागला         २/१०

श्रीभगवान म्हणाले 

शोक करणे अयोग्य ज्यांचा
शोक त्यांचा तू करतो
जीवित अथवा मृतांचा रे
शोकही पंडित ना करतो   २/११

असे कधी रे झाले नाही 
मी वा तू वा सगळे हे
नव्हते आधी नसतिल नंतर
प्रत्येक काळी आहेत हे     २/१२

बाल्य यौवन वार्धक्यातही
देही आत्मा तो वसतो
जातांनाही अन्य देहि तो
धीर पंडित रे धरतो       २/१३

थंडी अथवा जसा उन्हाळा 
येतो जातो नियमाने
सुखदुःखाची चाले गती ती
सोसावी ती धीराने     २/१४

सुखदुःखाला समभावाने
पुरुषश्रेष्ठा जो बघतो
अमृततत्वी जाई निश्चये
दुःखातुनि तो निवर्ततो       २/१५

नसणाऱ्या रे गोष्टीचे ते
असणे कधि का संभवते
असणाऱ्याचे नसणे तैसे
ज्ञानिजनांना ना दिसते      २/१६

भरून उरला पूर्ण शरीरी
आत्मा केवळ अविनाशी
समर्थ याला कोण मारण्या
विचार कर रे मनाशी    २/१७

देहाचा हा अंत बोलिला
आहे निश्चित रूपाने
आत्म्याचा ना अंत कदापि 
म्हणुनि लढावे यत्नाने      २/१८

म्हणतात जे हे, मरतो हा वा
मारतो अन्य कुणास हा
अज्ञानी ते दोघे असती
मरण मारण्या अक्षम हा     २/१९

जन्म न याला, मृत्यू कधि ना
पुनर्जन्मही यास नसे
नाही मारित शाश्वत हा जो
मारला कधिही जात नसे    २/२०

पार्था जो रे याला जाणतो
शाश्वत अजन्म नित्य असा
मारेल तो रे मारविल अथवा
नाही संभव कधिही असा    २/२१

वस्त्रे जुनि ती टाकुनि जैसी
नवीनं धारणं करतात
देह टाकुनी व्यर्थ जुना वा
धारणं नवीनं करतात    २/२२

याला जाळू शके न अग्नी 
पाणी भिजवू शके ना
शस्त्र छेदू शके न याला
वारा सुकवू शकेना      २/२३

खंड न याचा होत कधीही
दाह कधीही होत नसे
सुकणे भिजणे कसले याला
सकलांमध्ये नित्य वसे     २/२४

अविनाशी हा अदृश्य आत्मा
कल्पनेतही बसत नसे
जाणुनि यासी आता तू रे
शोक करणे उचित नसे   २/२५

जरी तुला हे वाटे शूरा
जन्मुनि नित्य हा मरतो
तरीही यास्तव तुजला वीरा
शोक न ऐसा शोभतो     २/२६

जन्म होता मृत्यू जैसा
मृतास जन्म निश्चित रे
म्हणुनि अटळ गोष्टीचा या
शोक करणे निष्फळ रे      २/२७

आरंभाच्या पूर्वी होती
सृष्टी पूर्ण अव्यक्त
राही नंतर तशीच ती ही
मध्ये शोक रे अयुक्त      २/२८

आश्चर्याचा कारक आत्मा
कोणी याला पाही वदती
ऐकुनि घेती विषयी याच्या
परंतु याला कधि न जाणती      २/२९

सर्वांच्या देहात अवस्थित
आत्मा नित्य अवध्य
म्हणुनि कोणाविषयी कधिही
शोक न करणे अवश्य     २/३०

क्षात्रधर्म हा तुला सांगतो
योग्य अशा युद्धाविना
नाही श्रेयस्कर ते दुसरे
कर्तव्य तुला युद्धाविना    २/३१

असे लाभले सहजतेने
युद्ध आज हे घोर तुला
जणु स्वर्गाचे दार उघडले
मान क्षत्रिया थोर तुला      २/३२

आणि जर का युद्ध टाळले
न्याय्य आणिक योग्य असे
कर्तव्याला चुकशिल तैसा
होईलं पापासहही हसे   २/३३

दुष्कीर्ती रे तुझी अर्जुना
करतील हे तू जाण रे
अपकीर्तीहुनि नाही दुःखद
सभ्या जाणे प्राण रे        २/३४

युद्ध टाळितो भ्याडपणाने
ऐसे वदतिलं महारथी
एरवी जे ते तुला मानिती
महारथींचा महारथी     २/३५

नको नको ते म्हणतिलं शत्रू 
वेळि अवेळी तुजसि असे
उणे लेखिता सामर्थ्याला
दुःखद याहुनि काय असे     २/३६

ऊठ आता रे कुन्तीपुत्रा
हो युद्धासी तू सिद्ध 
जिंकुनि करि तू राज्य इथे वा
जाण्या स्वर्गा हो सिद्ध     २/३७

सुख दुःखे वा लाभ हानि ती
विजय अथवा पराभव
समान मानुनि झुंज आता तू
पापही लागणे असंभव    २/३८

विवेचनातुनि तुज मी पार्था
आहे कथिले तत्त्व महान
ऐक बुद्धिच्या योगे कैसा
कर्मपाश तो तुटतो छान    २/३९

धर्ममार्ग हा विघ्नरहित रे
सत्कर्माचा नाश नसे
याच्या थोड्या आचरणाने
संकट मोठे टळत असे     २/४०

निश्चयी ते आक्रमितात
केवळ मार्ग सत्याचा
चळता बुद्धी आडवाटांनी
योग चालत राहण्याचा      २/४१

स्वार्थभरित ती कितीक कर्मे
मधुरबोले जी कथिली
अर्ध्यामुर्ध्या ज्ञानाची ती
लोकां किति रे आवडली    २/४२

भोग आणिक स्वर्ग अनेक
देतात जी जी लोकांना
आवडती ती अनेक कर्मे
जन्ममरण फेरा त्यांना     २/४३

भोग आणिक सुखांमध्ये
अखंड जे जे लडबडले
अस्थिर बुद्धी असलेले हे
शाश्वत सुखास अंतरले    २/४४

आत्ममग्नी शांती खरि ती
सत्त्वशील रे अर्जुन हो 
त्रिगुणांच्या त्या वेदवचनां-
-च्याही अगदी पार हो      २/४५

क्षितिजव्यापी असता जळ ते
विहिरीचे जे मूल्य असे
वेदांचे ते ज्ञान्यांसाठी
एवढेच काय ते मोल असे   २/४६

कर्मावर रे फळावर ना
कधि असावे नियंत्रण
विफल आहे फल आशा ती
हो कर्तव्य परायण     २/४७

अशा भोगामध्ये हो स्थिर
टाकुनि सगळी आसक्ती 
समान पहाणे जयपराजय
हाच योग अन् ही भक्ती   २/४८

हीन कर्म तू दूरही टाकी
बुद्धीने रे धनंजया
अनुदारांचा फलहेतू तो
बुद्धिशरण हो मिळव जया   २/४९

अश्या विवेके दूर सार तू
बरी नि वाईट ती फले
योगाला त्या अंगिकार तू
कर्मकुशलता ज्यात फुले    २/५०

बऱ्या वाईट कर्मांच्या रे
जन्म फळाने लाभतो
त्यागुनि आशा फळाची मग
ज्ञानी मुक्ती मिळवितो      २/५१

विवेकाने जेंव्हा तू रे
करशिलं मोहारण्य पार
ऐकलेले अन् ऐकायचे ते
नसेल काही उरले फार    २/५२

वेदकथित त्या कर्मफलांच्या
पार जावी बुद्धि तुझी
आत्ममग्न त्या समाधिमध्ये
अचल रहावी स्थिती तुझी   २/५३

अर्जुन म्हणाला 

स्थिरबुद्धीच्या व्यक्तीचे ते
काय रे लक्षण केशवा
चालतो बोलतो कसा तो रे
सांग मला ते माधवा    २/५४

श्रीभगवान म्हणालेत

सर्व इच्छा टाकतो जेंव्हा 
इंद्रियांच्या तृप्तीच्या
मग्न आत्मसमाधीतही
गोष्टी त्या स्थिरबुद्धीच्या   २/५५

दुःखाने जो नाही त्रासत
ज्यासि सुखाची ओढ नसे
क्रोध भीती आसक्तीच्या
पार मुनी तो स्थिरहि असे   २/५६

जिथे तिथे तो अनासक्तही
प्राप्त शुभाशुभ होतांना
आनंदी अन् द्वेषि न होई
बुद्धी सुस्थिर होतांना      २/५७

जसे कासव अंग आवरी
स्वतःच्याच कवचात
स्थिरबुद्धीचा ओढी इंद्रिये 
राही न विषयकचाट्यात   २/५८

गोडी याला लागे जेंव्हा 
या सर्वोच्च तत्त्वाची 
रुची निघून जाते तेंव्हा 
मनापासुनी विषयांची    २/५९

ज्ञानी व्यक्तीलाहि अर्जुना
प्रबळ इंद्रियांचेच भय
बळे बळे ती मना ओढिती
कठिण त्यापासूनि अभय  २/६०

संयम करुनी वरती इंद्रिया
श्रेष्ठ तत्त्वी राहतो जो
होते स्थिर ती बुद्धी त्याची
इंद्रियांचा स्वामी तो    २/६१

विषयांच्या त्या चिंतनातुनी
होते निर्माण त्यांची ओढ
ओढीतुनि ती येई वासना
वासनेतुनी जन्मे क्रोध   २/६२

क्रोधातुनि मग मोह जन्मतो
स्मृति जाते मोहामुळे
गोंधळ सगळा नासवि बुद्धी
नाशाचे मग गणित जुळे   २/६३

द्वेष प्रीतिच्या वाचुनि ज्याची
आचरताती इंद्रिये
परमसुखाची प्राप्ती त्याला
बोलिलि आहे निश्चये   २/६४

परमसुखाच्या ह्या प्राप्तीने
नाश अवघ्या दुःखाचा
प्रसन्न सुंदर स्थितीत ऐशा
लाभ बुद्धिस्थिरतेचा     २/६५

तल्लीनता रे नाही ज्याला
बुद्धी त्याची डळमळते
अस्थिर अश्या स्थितीमध्ये 
सुखशांतीही कोसळते    २/६६

इंद्रियांच्या चिंतनी ती
हटकुनी बुद्धी भरकटते
वादळात रे नाव जशी ती
भलता मार्ग आक्रमिते    २/६७

म्हणून शूरा इंद्रियांना
विषयांपासुनि ठेवी दूर
होतो तोचि स्थिरबुद्धीचा 
तरतो विषयनदीचा पूर    २/६८

बुद्धिपातळित निद्रित प्राणी 
संयमी तेथे जागा असतो
इंद्रियांतही जागृत प्राणी
तिथे हा निद्रा सेवित असतो  २/६९

लक्ष नद्यांनी भरतो सागर
तरीहि राही शांत जसा
इच्छांच्याही लक्ष प्रवाही
मुनिवर राही शांत तसा     २/७०

टाकुनि इच्छा अवघ्या साऱ्या
अहंकारा सोडी तो
निस्वार्थी तो इंद्रियस्वामी
गोड शांती अनुभवतो   २/७१

उच्च स्थितिला अशा जाता
ढळत नाही तिथूनि पार्था
मरणोत्तर ती स्थिती ईश्वरी
टाळी थेट महा अनर्था    २/७२

ॐ तत्सत् म्हणू या आता
गीता उपनिषदातला 
सांख्ययोग नाव ज्याचे
अध्याय दुसरा संपला

- ©चारुचंद्र उपासनी

No comments:

Post a Comment