प्रद्युम्नवाटिका (शेरूबाग)
अध्याय तिसरा (कर्मयोग)
अर्जुन म्हणाला
विवेकवती बुद्धी जर का
कर्माहुनही श्रेष्ठ रे ।
घोर अशा या युद्धामध्ये
केशव का मज नेतोस रे ।।३/१
तुझ्या दुहेरी, या कथनाने
गोंधळ मनि किति दाटला ।
एकच काय जे नेमके ते
श्रेयस्कर रे सांग मला ।।३/२
श्रीभगवान म्हणालेत
दोन प्रकारच्या लोकांच्या या
निष्ठा तुजला सांगितल्या ।
ज्ञानियांनी ज्ञानाने त्या
कर्मिंनि कर्मात आचरिल्या ।।३/३
कर्म न करण्याने रे मुक्ती
कर्तव्यातुनि न च मिळते ।
कर्म टाकिता अधुरे व्यक्ती
सिद्धी कधिहि न पावते ।।३/४
निसर्ग जीवा मुळीहि क्षणभर
स्वस्थही राहू देत नसे ।
असहाय अशा या स्थितीमध्ये
कर्म न करणे युक्त नसे ।।३/५
केवळ कर्मेन्द्रिये रोखुनी
साधू होण्या जो धजतो ।
विषयांनाही मनात स्मरता
ढोंगी मात्र रे, तो ठरतो ।।३/६
मिळवुनि विजय मनावरी या
कर्तव्यातचि इंद्रिये ।
सोपवुनी जो राही अलिप्त
पायी त्याच्या सिद्धी ये ।।३/७
क्रियाशून्यतेपेक्षा कितितरी
' योग्य कर्म ' ते श्रेष्ठ रे ।
कर्मावाचुनि निव्वळ रहाणे
शरिरालाही अशक्य रे ।।३/८
स्वार्थरहित त्या कर्माने रे
मिळते मुक्ती धनंजया ।
कर्मांनी त्या अन्य अशा रे
रहातो जीव बंधनी या ।।३/९
स्वार्थरहित या कर्मांसहही
निर्मिली देवे ही सृष्टी ।
आणि म्हणाला या कर्माने
व्हावी तुमची हो तुष्टी ।।३/१०
आचरणाने कर्तव्याच्या
होतिल देवही संतुष्ट ।
सुखी करतील तुम्हाही ते
टळेल मोठे वितुष्ट ।।३/११
तुष्ट तुम्हावर होउनि देव
देतिही तुम्हा संपत्ती ।
भोगाल एकटे ठराल चोर
ओढवेल केवढि ही विपत्ती ।।३/१२
पापचि भक्षिति केवळ जे ते
भोगति अवघी संपत्ती ।
सत्कार्यातूनि उरलेली ती
भोगुनि टाळा आपत्ती ।।३/१३
पाऊस निर्मी अन्न आणिक
अन्न पोशिते जीवांसी ।
सृष्टिचक्र हा यज्ञ असे रे
कर्म सहाय्यक ते त्यासी ।।३/१४
कर्मे ती ती असती दैवी
देवे तुजला लावली ।
आचरणाने देवामध्ये
होइल बुद्धि स्थिरावली ।।३/१५
सोडुनि सृष्टिचक्राला त्या
आचरितो जो अर्जुना ।
निरुपयोगिही असा तो
अर्थ न त्याच्या जीवना ।।३/१६
आत्म्यामध्ये स्वतःच्या जो
रमलेला रे जीव महान ।
कार्य आणिक कर्तव्याच्या
पार असतो भाग्यवान ।।३/१७
(हे वर्णन कोणत्याही क्षेत्रातल्या आत्यंतिक प्रतिभावानास लागू पडतं)
प्रतिभावंताला अशा रे
कर्तव्याचे बंधन नसते ।
कोणावरती त्याचे काही
मुळीच अवलंबित्व नसते ।।३/१८
स्थिती अशी ही येण्यासाठी
अनासक्तिने कर्म करी ।
परमप्राप्तिची इच्छा पार्था
असेल जर का तुझ्या उरी ।।३/१९
आचरणाने अशा सिद्धिला
जनकादिक ते पोहोचले ।
स्थितीत ऐशा येण्यासाठी
कर्मचि कर तू चांगले ।।३/२०
जसे श्रेष्ठ आचरितो रे
अनुसरती त्या तसेचि लोक ।
मानुनि प्रमाण त्याला ते रे
मार्गे त्याच्या जाती लोक ।।३/२१
त्र्यैलोक्यातहि अवघ्या पार्था
नसे मला रे कर्तव्य ।
तरीहि करितो कर्म सतत मी
नसुनि काहि रे प्राप्तव्य ।।३/२२
तन्द्रि जराशी मला लागली
जाइल थांबुनि मम कर्म ।
येती लोक मागे माझ्या
जाण सकलांचे वर्म ।।३/२३
थांबवले मी कर्म जरि का
होइल गोंधळ केवढा जाण ।
होतिल नष्ट जीव अवघे
जातिल त्यांचे क्षणात प्राण ।।३/२४
करिती कर्मे आसक्तीने
जशी अर्जुना मूढ लोक ।
तशीच कर्मे करि लोकांस्तव
सोडुनि हाव आणिक लोभ ।।३/२५
अज्ञानाने करिती कर्मे
गोंधळ त्यांचा उडवु नये ।
करवुनि घ्यावी ज्ञानाने ती
कर्महीनता आणू नये ।।३/२६
जीवा प्रेरित निसर्ग असतो
कर्मास्तव रे अहर्निश ।
वाटे जीवा तोचि कर्ता
स्वतःस मानी तो ईश ।।३/२७
गुणकर्मांचा चाले खेळ
तत्त्व जाणितो तो खरा ।
निसर्ग चाले त्यावरती रे
अनासक्त तो खराखुरा ।।३/२८
निसर्गाच्या प्रबळ प्रभावे
कर्मकचाट्यात सापडतात ।
अज्ञ जीवा ज्ञानियाने
दुखवु नये, ते धडपडतात ।।३/२९
कर्मे सगळी अर्पुनि मजला
व्हावे आध्यात्मिक रे तू ।
टाकुनि मोह सारा तू रे
व्हावे युद्धास सिद्ध तू ।।३/३०
माझ्या या जे विचाराला
अनुसरती ते सदा भले ।
मत्सररहितहि श्रद्धालू ते
कर्मबंधनी मोकळे ।।३/३१
द्वेषग्रस्त जे विचारास या
ठोकरताती सर्वत्र ।
अज्ञानी ते जाण अर्जुना
मनबुद्धीचे परतंत्र ।।३/३२
आपआपुल्या निसर्गभावे
आचरितो तो ज्ञानीही ।
अवघे प्राणी निसर्गवश ते
निग्रह करि ना काहीही ।।३/३३
विषयात त्यांच्या इंद्रियांना
आसक्ती अन् द्वेष खरा ।
विघ्न त्यांचे आत्ममार्गी
अधिन न होणे मार्ग खरा ।।३/३४
परकर्तव्य भले जरी ते
कर्म आपले श्रेष्ठ तरी ।
दोषसहित रे असो किती ते
पाळा येई मरण जरी ।।३/३५
अर्जुन म्हणाला
इच्छा नसतांना रे कृष्णा
व्यक्ती पापहि आचरिते ।
प्रेरी तिजला सांग कोण रे
बळे तिथे जे लोटिते ।।३/३६
श्री भगवान म्हणाले
रजोगुण हा खुशालचेंडू
राग अन् इच्छा निर्मितो ।
खादाड आणिक पापि भयंकर
जाण तू याला वैरी तो ।।३/३७
जीवाची ही इच्छा म्हणजे
आरसा धुळीमुळे जसा ।
वारेने तो गर्भ वेष्टिला
धुराने तो अग्नि जसा ।।३/३८
इच्छा वैरिण झाकी ज्ञान
ज्ञान्यांचे ते अर्जुना ।
अग्नीची जशि कधिच तुष्टी
जळून पूर्ण होत ना ।।३/३९
मन बुद्धि इंद्रिय आणिक
इच्छा इथेच राहते ।
या सर्वांना संमोहुनि ती
ज्ञानाला रे झाकते ।।३/४०
म्हणौनि आधी इंद्रियांना
वशहि करावे अर्जुना ।
श्रेष्ठ ज्ञान नासवणाऱ्या
इच्छेला तू मार ना ।।३/४१
श्रेष्ठ सारी इंद्रिये ती
थोरवी त्याहुनि मनाला ।
श्रेष्ठ मनाहुनि बुद्धी आणिक
सर्वात थोरवी आत्म्याला ।।३/४२
स्थिर तू हो रे बुद्धीने त्या
मान स्वतःला बुद्धीपार ।
इच्छा नामे कठिण शत्रुसी
जिंकावे तू आरपार ।।३/४३
'ॐ तत्सत्' म्हणु या आता
गीता उपनिषदातला ।
कर्मयोग म्हणुनी आता
अध्याय तिसरा संपला ।।
©चारुचंद्र उपासनी.
No comments:
Post a Comment